Tuesday, January 3, 2023

कुडतरकर लक्ष्मी ५०

वीस हून अधिक वर्षे झाली असतील; ती आमच्या कुटुंबाचा भाग झाली. दिसायला अगदी चारचौघींसारखीच.थोडीशी मान कलती ठेवून उभी राहणारी . कोकणातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या तुळस ह्या अगदी छोट्याश्या पण निसर्गाची आणि मत्स्यसंस्कृतीची जोड लाभलेल्या गावातून मुंबईत आलेली . चार  सालस बहिणी आणि एक  भाऊ, आई ,वडील असा कुटुंब कबिला. आई  साधीभोळी ,वडील देवमाणूस. रस्त्यातून चालतानाही नजर वर न करता चालणारे सरळमार्गी . चेंबूरच्या मराठी बहुल टिळक नगर मध्ये अनुभवलेले लहानपण बरेच काही देऊन गेले .मराठी वातावरण असल्याने  मराठी सण ,परंपरा लहानपणापासूनच मनावर  बिंबलेल्या ,व्यक्तिमत्वाचाच एक भाग झालेल्या . जात्याच हुशार असल्याने शिक्षणात कसलाही अडथळा आला नाही,कर्तव्यदक्ष वडिलांनी  तुटपुंज्या पगारात सर्व लेकरांचे शिक्षण व्यवस्थित केले .शिक्षण चांगले असल्याने नोकरी ही चांगली आणि पट्कन मिळाली. 
तर असे चांगले संस्कार,चांगले  शिक्षण नोकरी, चाळसंस्कृतीत वाढल्याने जुळवून घ्यायची,सर्वाना एकत्र करून राहण्याची वृत्ती अशा बर्याच चांगल्या गुणांची शिदोरी अन आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ती सुचिता शिवराम सावंत ची ...ची.सौ.कां सुचिता उदय कुडतरकर होऊन कुडतरकर घराण्यात प्रविष्ठ झाली. हे सावंतवाडीचे कुडतरकर म्हणजे तसे प्रतिष्ठित घराणेच. एक तर हे आमचे तीनही बंधू कमालीचे देखणे आणि सर्व गुणसंपन्न . तितकेच मनस्वीही आणि हट्टीही. तिचा ज्याच्याशी पाट लागला ते आमचे सर्वात मोठे बंधुराज तर गायन,चित्रकला,खेळ(वायफळ खरेदी इत्यादि ) अशा अनेक कलांमध्ये पारंगत,अभ्यासात ही कमालीचे हुशार. पण त्याच बरोबर कलाकार असल्याने अत्यंत मनस्वी आणि अगदी लहान मुलासारखे खट्याळ . अशी माणसे प्रवाही पाण्यासारखी असतात. त्यांना मायेचे, धाकाचे कुंपणाची गरज असते असे कुंपण जे त्यांच्या प्रतिभेला साथ देईल आणि प्रसंगी कठोर होवून त्यांना योग्य प्रसंगी रोखून ही धरेल. हे काम गेली वीस वर्षांहूनही अधिक काळ ती करत आहे. सर्व नात्यांचे महत्व जाणून आहे त्यांना योग्य तो मान देत आली आहे. आज वयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना तिला आनंद तर होत असेलच पण या दिवसाच्या पूर्वसंध्येला  मागे वळून बघताना या घरात अनुभवलेले बरे वाईट प्रसंगांचा ,अनुभवांचा कॅलिडोस्कोप तिच्या डोळ्यांसमोर असेल ,चांगला अनुभव आनंद देऊन गेला तर वाईट अनुभव काही तरी शिकवून गेला असेच तिला वाटत असेल हे नक्की . जीवन नगर मधल्या त्या वन रुम किचन घरात नवरा,त्याचे दोन भाऊ सासू सासरे एव्हढी मंडळी असून देखील गुण्या गोविंदाने केलेला संसार आठवत असेल तिला. तिच्या दोन्ही मुलांचा जन्म,त्यांच्या लहानपणीच्या गोड आठवणी आठवत असतील. एव्हढं मोठे कुटुंब असल्याने भांड्याला भांडे लागलेही असेल, पण त्यामुळे त्या भांडयांना पोचा पडणार नाही याची दक्षता नेहमीच घेत आलीय ती. 
तशी ती फारशी रागवत नाही. पण कधीतरी कुणावर राग ही आला असेल.अशा प्रसंगी माहेरच्या आठवणीने हळवी ही झाली असेल ते आठवेल. सायकल साठी हट्ट धरून बसलेल्या १४ वर्ष्यांच्या टोणग्या दिराला समजवता,समजवता नाकी नऊ आले होते तिच्या आणि दादाच्या. पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या त्या वांड कार्ट्याला मायेने,प्रेमाने स्वत:च्या हाताने भरवले होते तिने. स्वकमाईने घेतलेले काल्हेरचे घर आठवत असेल तिला आणि आज मुलुंडमध्ये तीन खोल्यांचे स्वमालकीचे घर समाधान देत असेल.अति काळजी करते ,नेहमी कामाच्या गडबडीत असते,सारखी मुलांच्या मागे असेही तिला बर्याचदा म्हटले गेले पण तिने कधीच त्याला प्रत्युत्तर केले नाही.हसून ते सहन करत आली. ती आली आणि माझी प्रगती झाली असे आमचे बंधुराज म्हणतात ते उगीच नाही. सर्व कुटुंबाला एकत्र धरून ठेवण्याचे काम माझ्या तीनही वहिन्यांनी केलेय  त्यातही ही सर्वात ज्येष्ठ असल्याने हिची जबाबदारी कांकणभर जास्तच. लक्ष्मीच्या पावलांनी ती आली आणि कुटुंबात अशी मिसळून गेली जणू दुधात साखर . मुलांवरही खूप चांगले संस्कार आहेत.दोन्ही मुले अत्यंत हुशार आणि प्रेमळ आहेत (खरे तर आमची सर्व पुतणे मंडळी गोड आहेत). वयाची पन्नाशी असली की तिला सुवर्णमहोत्सवी वर्ष असे म्हणतात. आज आमची सुचिता वहिनी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करतेय. सुवर्ण भट्टीत टाकले की त्या आगीने त्याला अजूनच झळाळी येते; ते त्याच्या गर्भित तेजाने उजळून निघते.त्याचप्रमाणे संसाराच्या भट्टीत आपल्या आयुष्याचे सोने अर्पण केल्याने  आपल्या कुटुंबियांच्या प्रति असलेल्या समर्पण भावनेच्या ,कर्तव्याच्या,प्रेमाच्या गर्भित तेजाने वाहिनीचे सुवर्णरूपी व्यक्तिमत्व अधिकच झळाळून उठले आहे आणि तिच्या गर्भित उबदार मायेची पखरण तिच्या सुहृदांवर सदैव होत राहील याची मला खात्री आहे. या वयपरत्वे अधिकच तेजस्वी होत चाललेल्या व्यक्तिमत्वाचा आज सुवर्णमहोत्सवी वाढदिवस . वहिनी तुझी आजवरची वाटचाल स्तंभित करणारी आहे .यापुढेही तुझी अशीच यशस्वी वाटचाल होवो . तुला उदंड आयुष्य लाभो .तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना....